डॉ. संदेश शहा, इंदापूर
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना इंदापूर व्यापारी संघाच्या वतीने भीमा नदीवर शिरसवडी ते कुगाव पूल करण्याची मागणी भरत शहा यांनी माझ्या प्रमुख उपस्थितीत केली होती. याची दखल घेऊन आमचे नेते अजित पवार यांनी ३८२ कोटी रुपयांची रक्कम तत्काळ मंजूर करून या पुलाचे काम जोरात सुरू केले. त्यामुळे इंदापूर शहर व तालुक्याच्या प्रगतीसाठी पाचपट वाढ होणार आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार व एकनाथ शिंदे यांच्या कडून इंदापूर शहराच्या विकासासाठी निश्चित निधी आणला जाईल. त्यामुळे या निवडणुकीत विकासाची दृष्टी असलेले पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार भरत शहा व नगरसेवक पदाचे २० उमेदवार यांना प्रचंड मताधिक्याने विजयी करावे असे आवाहन राज्याचे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी केले.
इंदापूर येथे भरत शहा व शहा परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षात सहकाऱ्यांसमवेत प्रवेश केला. यावेळी राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पुणे जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे यांच्या हस्ते पक्षाचे तालुकाध्यक्ष हनुमंत कोकाटे, कार्याध्यक्ष अतुल झगडे, शहराध्यक्ष बाळासाहेब ढवळे यांनी भरत शहा व मित्र परिवार यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश दिला. यावेळी मार्गदर्शन करताना मंत्री भरणे बोलत होते.
मंत्री भरणे पुढे म्हणाले, इंदापूर शहराच्या नगराध्यक्षा सौ. अंकिता शहा या विरोधी पक्षात असताना देखील आपण शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कोट्यावधी रुपयांचा निधी दिला. अंकिता भाभी यांनी स्वच्छता अभियानात इंदापूर शहरास राष्ट्रीय पातळीवर झळकवले. इंदापूर शहराचा विकास करण्यासाठी शहा यांचे घराणे अग्रगण्य आहे. शहा घराण्याने यापूर्वी देखील शहर व तालुक्याच्या विकासासाठी अनमोल योगदान दिले आहे. याच घरातील भरत शहा यांनी भीमा नदीवर शिरसवडी ते कुगाव पूल करण्याची मागणी केल्यानंतर त्याची तातडीने मंजुरी घेऊन त्यावर निधी टाकून तातडीने काम सुरू करण्यात आले. कमी कालावधीत मंजूर होऊन काम सुरू झालेला देशातील हा पहिलाच प्रकल्प आहे. आपणास शहर विकासाची आणखी कामे करायची आहेत. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलला आपले आशीर्वाद रुपी मते देऊन विजयी करावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
जिल्हा बँकेचे संचालक आप्पासाहेब जगदाळे म्हणाले, इंदापूर तालुक्याची जडणघडण माजी खासदार कै. शंकरराव पाटील, माजी आमदार राजेंद्रकुमार घोलप व गणपतराव पाटील, गोकुळशेठजी शहा, विठ्ठलराव गुंडेकर काका आदींनी केली आहे. त्यांचा वारसा संवर्धित करण्याचे काम भरत शहा व परिवार करत आहे. विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी मंत्री दत्तात्रय भरणे यांना सहकार्य केले आहे. त्यामुळे भरत शहा व पॅनेलला शहर विकासासाठी विजयी करा असे आवाहन त्यांनी केले.
यावेळी भरत शहा म्हणाले, आम्ही पैसेवाले आहोत, आम्ही पदा साठी हपापलेले आहोत असे आमचे विरोधक म्हणतात मात्र आमची श्रीमंती वाडवडिलां पासून असून आम्ही वाममार्गाने पैसे कमविले नाहीत. आमचे कुटुंब २४ तास काम करून सचोटीने पैसे कमवत आहोत. आम्ही ७० वर्षापासून ज्यांच्याकडे काम केले ते प्रामाणिकपणे केले. माझ्याकडे तीन संस्थांची मोठी पदे होती मात्र आम्ही त्याचा राजीनामा देऊन बाहेर पडलो. सर्व गोष्टी पैशावर झाल्या असत्या तर आज टाटा, बिर्ला, अदानी, अंबानी हे पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री किंवा सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दिसले असते. आम्ही जनतेची सेवा करत असून जनता आम्ही केलेल्या विकासकामांची निश्चित पोचपावती आम्हाला या निवडणुकीत देतील असा आत्मविश्वास त्यांनी व्यक्त केला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते डॉ. शशिकांत तरंगे, शकिलभाई सय्यद यांची भाषणे झाली. प्रास्ताविक व सूत्रसंचलन राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष अतुल झगडे यांनी केले. यावेळी मधुकर भरणे, वसंत मोहोळकर, बापू शेंडे, अरविंद वाघ, दिलीप वाघमारे, गणेश महाजन, विठ्ठल कोकाटे, गजानन गवळी, पोपट शिंदे, स्वप्नील राऊत, अनिकेत वाघ, प्रमोद राऊत, प्रशांत उंबरे, अशोक चव्हाण, आरशद सय्यद, सुनील तळेकर, जयवंत बानकर, अमोल माने, उमेश महाजन उपस्थित होते.
